पेडली येथील 35 वर्षे जुना पुल धोकादायक कधीही कोसळण्याची शक्यता, अनेक गावांचा संपर्क तुटणार
पेडली/आसरे : (आनंद जाधव) १९८९ च्या महापुरानंतर पेडली पासून आसरे ,नवघर, कासारवाडी, धोंडीवली , वान्द्रोशी, कोडंगाव , ठाणाळे व पुरातन वीरेश्वर मंदिरा कडे जाण्याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेडली येथे पूल बांधण्यात आला होता. ह्या पुलामुळे अनेक गावांशी संपर्क साधता येतो परंतु 1989 ते 2023 या 34 वर्षाच्या काळात या पुलाची कुठल्याही प्रकारची डागडुजी न केल्याने या पुलाची दुरवस्था झाली असून पूल मोडकळीस आला आहे.तसेच पुलाचे संरक्षक कठडेही तुटले आहेत. पुलावर मोठ मोठे खड्डे पडून पुलाच्या सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आसरे ,नवघर, कासारवाडी, धोंडीवली , वान्द्रोशी, कोडंगाव , ठाणाळे या गावातील नागरिकांची प्रमुख बाजार पेठ पेडली आहे. शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी व पाली ला जाणारे मार्ग हे पेडली वरुनच आहे. या गावातील नागरीक गावात राहत असले तरी सर्व व्यवहार हे पेडली मधुनच होतात. जर हा पूल मोडकळीस येवून पडला तर अनेक गावांचा संपर्क तुटेल व आजू बाजूंच्या गावांच्या रहदारीची दुरवस्था होणार आहे. कारण या पुला व्यतिरिक्त या गावांकडे जाण्याकरिता कुठलाही पर्याय नाही. या बाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी नाराजीचे सूर काढत एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न येथिल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जर या पुलाकडे जिल्हा परिषदेचा बांधकाम अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर, आम्ही सर्व पेडली पंचक्रोशी ग्रामस्थांना सोबत घेऊन बांधकाम अधिकारी यांच्या दालना समोर जन आंदोलन करू असे पेडली येथील व्यापारी असोशियनचे अध्यक्ष व वाहतूक सेना तालुका संघटक विक्रम देशमुख यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत